मराठी

नेपाळ चीनमध्ये वाढविणार गुंतवणूक

भारताला शह देण्याची खेळी

बीजिंग/काठमांडू: भारतासोबत वाढत्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या शेजारी देशांना आपल्याकडे वळवण्याचा चीन जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी चीनकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू आहे. बेल्ट अॅण्ड रोड इनिळिएटीव्ह (बीआरआय)च्या माध्यमातून चीन अनेक देशांमध्ये गुंतवणूक करत आहे. नेपाळमध्येही चीन पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवत आहे. तिबेट आणि नेपाळला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पात चीनने आणखी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनने तिबेटमधील पायाभूत सुविधेत जवळपास १४६ अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याची योजना तयार केली आहे. ही रक्कम आधीच सुरू असलेल्या प्रकल्पांसह इतर नव्या प्रकल्पात गुंतवण्यात येणार आहे. यामध्ये बहुप्रतिक्षित नेपाळ-तिबेट दरम्यानच्या रेल्वे लिंकला पूर्ण करण्याच्या कामाचाही समावेश आहे. चीन तिबेट-नेपाळ दरम्यान काठमांडू आणि तिबेटचे दुसरे मोठे शहर शिगात्सेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरही जोर देत आहे. बीआरआयच्या अंतर्गत होणारा ७२ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग तिबेटपासून काठमांडूहून लुंबिनीपर्यंत जाणार आहे. म्हणजेच भारतीय सीमेजवळून हा रेल्वे मार्ग असणार आहे.
नेपाळ हा भारत आणि चीन दरम्यान बफर झोन समजला जातो. नेपाळला भारत हा नैसर्गिक मित्र समजतो; मात्र चीन आता नेपाळमध्ये आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. नेपाळला आपल्या बाजूने वळवण्यासाठी चीन सर्वपरीने प्रयत्न करत आहे. नेपाळ आणि चीनमध्ये २०१८ मध्ये याबाबतचा करार झाला होता. काही स्थानिक तज्ज्ञ या रेल्वे प्रकल्पाला ‘कागतको रेल’ (कागदी रेल्वे) आणि स्वप्नातील रेल्वे असे संबोधत आहेत. त्याशिवाय, नेपाळने चीनपासून अधिक सावध होण्याची आवश्यकता असल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले. नेपाळला चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज मिळत आहे; मात्र एवढे अवाढव्य कर्ज कसे फेडणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. चीनने याआधी काही गरीब देशांना आपल्या कर्जाच्या विळख्यात अडकवले आहे.

Related Articles

Back to top button