मराठीयवतमाल

महाराष्ट्रातील पतसंस्था बंद पाडण्याचे अमित शहांचे षडयंत्र

जनतेचा पैसा लुटणाऱ्या संचालकांवर फौजदारी कारवाई करा- किशोर तिवारी

यवतमाळ/दि11-महाराष्ट्रातील 3 लाख कोटीची उलाढाल असणा-या तसेच तीन लाख रोजगार देणा-या नागरी बॅंका व पतसंस्था बंद पाडण्याचे षडयंत्र केन्द्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी रचले आहे. हा त्यांचा डाव आम्ही पुर्ण होऊ देणार नाही. दुसरीकडे बाबाजी दाते महिला बॅंकेला संगनमताने लुटणा-या संचालक, अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आज शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष तसेच शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिली. ते यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते.

मागील १४ महीने वसुली करू नये असा आदेश केन्द्र सरकारने काढला होता. दुसरीकडे या आदेशाने अडचणीत आलेल्या तसेच सरकारी बँका प्रमाणे २ लाख कोटीचे पॅकेज नागरी बँकांना न देता केंद्रामध्ये सहकार खाते उघडल्या बरोबर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे रोज नविन आदेश काढत आहे. या आदेशामुळे आर बी आई सुध्दा आपल्या अधिकाराचा बेफाम दुरुपयोग करीत निर्बंध लावत आहे.  पहिले मलकापूर अर्बन बँक त्यानंतर कै. बाबाजी दाते महीला अर्बन बँक व आता नगर अर्बन बँकेवर निर्बंध लावल्याने सुमारे ३ लाख कोटीच्या नागरी सहकारी बँका, पत संस्था यामधील ठेवी झपाट्याने काढण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या व चाकरमान्या पेन्शन धारकांनी आपल्या ठेवी ठेवलेल्या बॅंका मात्र या निर्णयामुळे अडचणीत आल्या आहे. ३ लाख कोटीच्या नागरी सहकारी बँका व पत संस्था गुजरातच्या खाजगी बँकांना देण्याचा कट मोदी-शहा यांनी रचला असून पीएमसी बैंक सुद्धा या अधिवेशनात कायदा करून खाजगी बँकेला देण्याचा अफलातून निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना मात्र या नागरी सहकारी बँका लुटण्याच्या कट यशस्वी होऊ देणार नाही. या सर्व ३ लाख रोजगार देणा-या नागरी बँका व पत संस्था व त्यांचे ठेवीदार ग्राहक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार असून केंद्र सरकारचा हा कट उधळून लाऊ असा स्पष्ट इशारा यावेळी किशोर तिवारी यांनी दिला. दरम्यान आज टिम्बर भवन येथे कै. बाबाजी दाते महिला बँकग्रस्त, ठेवीदार, ग्राहक व कर्मचा-यांसोबत झालेल्या बैठकीत बँकेचे अधिकारी, संचालक, ऑडिटर, रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिका-यांच्या विरोधात गंभीर तक्रारी आल्याचे सांगीतले. मात्र हा सर्व गोरखधंदा मागील २ वर्षाच्या कोरोणामूळे तसेच केंद्र सरकारने वसुली रोखल्याने आला असून यावर सरकार गंभीर आहे. २ वर्षांच्या कोरोणामुळे तसेच लॉक डाऊन मुळे धंदे बुडाल्याने  पतसंस्थांचा एनपीए वाढला असतांना आरबीआई ने निर्बंध लावणे चुकीचे असून यावर केंद्र सरकारने तोडगा काढावा यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगीतले.

महाराष्ट्रातील कोट्यवधी दलित, मुस्लिम, आदीवासी, शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय लोकांच्या ठेवी बँकेचे अधिकारी संचालक, ऑडिटर, रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिका-यांनी लूट केल्याचा तक्रारी सुद्धा महाविकास आघाडी सरकारकडे आल्या आहे. त्यामुळे हा विषय गंभीरपणे घेणार दिसून यावर विशेष नियंत्रक तसेच महाराष्ट्र पोलीस कडून एसआईटी निर्माण करून बँकेचे अधिकारी, संचालक, ऑडिटर, अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व लुटीची रक्कम बाहेर काढणार असल्याचे तिवारी यांनी सांगीतले.  एकाही ठेवीदार, ग्राहक यांची घामाची कमाई बुडणार नाही व यासाठी शिवसेना सर्व चोरांना आंदोलन करून गजाआड करेल अशी हमी आज बाबाजी दाते महिला सहकारी बैंक ग्रस्तांच्या बैठकीत दिल्याची माहीती शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एक वर्षापूर्वी ज्या बँकेचा एनपीए फक्त ४ टक्के होता. एकदम ऑडिटर नवा आल्यानंतर ३१ मार्च २०२१ च्या अंकेक्षणामध्ये बँकेचा नेट एनपीए ५१.११ टक्के तर ढोबळमानाने ६४.९३ टक्केपर्यंत पोहचल्याचे दिसून आले. हा सर्व प्रकार बँकेचे अधिकारी, संचालक, ऑडिटर, रिझर्व बँकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी संघटीतपणे केलेल्या लुटीचा परीणाम असतांना यावर भाजपाचे आमदार गप्प का असा सवालही किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक बॅंकेत सुध्दा दाते महिला बॅंकेचा भ्रष्ट पॅटर्न राबवित असून गरीबांचे पैसे असलेल्या अशा पतसंस्थांचा सुध्दा आपण भंडाफोड करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील बॅंका, पतसंस्था जीवंत राहील्या पाहीजे. यावर लाखो नागरीकांचे जीवन अवलंबून आहे. गरीबांचा पैसा या ठिकाणी ठेवीच्या स्वरुपात ठेवला आहे. त्यामुळे बॅंका, पतसंस्था सुध्दा बंद होता कामा नये तसेच बॅंकेतील भ्रष्टाचार सुध्दा संपविण्यासाठी सरकारने कठोर पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगीतले. पत्रकार परीषदेला टिंबर मर्चन्ट असोसिएशनचे सचिव प्रविण निमोदीया, संदीप चव्हाण उपस्थित होते.

फौजदारी कारवाई करणार

बाबाजी दाते महिला बॅंकेत संचालक, अधिकारी यांनी मिळून भ्रष्टाचार केला आहे. जिल्हा उपनिबंधकाचा कारभार सुध्दा संशयास्पद आहे. त्यामुळे मंगळवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे. दोषींवर फौजदारी कारवाई केली जाईल अशी ग्वाही सुध्दा किशोर तिवारी यांनी दिली.

Related Articles

Back to top button