मराठी

देशातील प्रत्येकाला कोरोनाची लस देणार

नवी दिल्ली/दि.२९ – सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तर संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. जेव्हा कोरोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश आणि जगात कोरोना विषाणूचे संकट कायम आहे. सध्या भारतात कोरोनाच्या अनेक लसींवर चाचण्या सुरू आहेत. देशात लस उपलब्ध होताच सर्वांना ही लस दिली जाईल. कोणालाही वगळण्यात येणार नाही अशी खात्री मी देतो. भारत सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे आणि लोकांच्या मदतीने ब-याच जणांचे जीव वाचले. लॉकडाऊन लागू करण्याचा आणि त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्याचा कालावधी पूर्णपणे योग्य होता असा दावा त्यांनी केला.कोरोना विषाणूचे संकट अद्यापही कायम आहे, अशा परिस्थितीत लोकांनी सावध राहिले पाहिजे. सणांच्या दिवसात लोकांनी अधिक जागरूक असले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही.
लस वितरणाची तयारी सध्या भारत सरकारकडून केली जात आहे, जेणेकरून वेळ येताच संपूर्ण देशामध्ये ही लस उपलब्ध होऊ शकेल. एका अंदाजानुसार सर्व देशवासीयांना लस देण्यासाठी सरकारने सुरुवातीला 50 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. एका व्यक्तीला लस देण्यासाठी 385 रुपयांपर्यंत खर्च होईल असेही सांगण्यात आले आहे. तथापि, अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही किंवा भारत सरकारने कोणतीही अधिकृत योजना जाहीर केलेली नाही. परंतु देशातील शास्त्रज्ञ सतत लस बनवण्याचे काम करत आहेत आणि या लसीची चाचणी आता पुढच्या टप्प्यावर पोहोचली आहे. वास्तविक, नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात घोषित केले होते की, सत्तेत आल्यानंतर भाजपा बिहारमधील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देणार आहे. त्यानंतर अनेकांनी भाजपाच्या या घोषणेवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले. यावरून वादंग निर्माण झाला. विरोधकांनी भाजपाच्या या घोषणेवर निशाणा साधला. निवडणुकीच्या फायद्यासाठी कोरोनाचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपावर करण्यात आला. मात्र केंद्र सरकार राज्यांना ही लस उपलब्ध करून देईल त्यानंतर भाजपा सरकार राज्य सरकार पातळीवर जनतेसाठी मोफत पुरवेल असे स्पष्टीकरण भाजपने दिले होते.

Related Articles

Back to top button