मराठी

कोरोनावरील औषधांची टंचाई

कोरोनावर मात करण्यासाठी रेमडेसिविर या औषधाची मोठी मदत

मुंबई/दि. २३ – कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या औषधांचा तुटवडा कायम आहे. मुंबई(Mumbai) आणि महानगर प्रदेशातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असला, तरी अत्यंत महत्त्वाच्या अशा टोसिलीझुमाब(Tocilizumab) या औषधाचा रुग्णालयांमध्ये अभुतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णावर उपचार करताना हे औषध रेमडेसिविरसोबत मिळून वापरले जाते. कोरोनावर मात करण्यासाठी रेमडेसिविर या औषधाने आतापर्यंत मोठी मदत केल्याचे सिद्ध झाले आहे.

त्यामुळेच काही दिवसांपूर्वी रेमडेसिविरचाही(Remdesivir) अचानक तुटवडा निर्माण झाला होता. टोसिलिझुमाब किंवा अटलीझुमाबचा वापर सायटोकाईम स्टॉर्मचा सामना करत असलेल्या रुग्णांवर केला जातो. ठाण्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आरके मुरुडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे महापालिकेने टोसिलिझुमाबचे १०० इंजेक्शन मागवले आहेत, ज्यापैकी ५५ इंजेक्शनच आतापर्यंत आले आहेत. या इंजेक्शनची आयातच झालेली नसल्यामुळे एक आठवड्यापासून विक्रेत्यांकडेही हे इंजेक्शन उपलब्ध नाही, असे ते म्हणाले.

काळा बाजार रोखण्यासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालये रेमडेसिविरप्रमाणे टोसिलिझुमाबची खरेदीही ठराविक केंद्रांवर सहजपणे करू शकतात, जेथून थेट डेलिव्हरी केली जाते; पण सध्या या केंद्रावरही पुरवठा बंद आहे, अशी माहिती मुरुडकर यांनी दिली. नवी मुंबई महापालिकेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महापालिकेने टोसिलिझुमाबचे ५०० डोस मागवले आहेत; पण पुढच्या आठवड्यापासूनच पुरवठा सुरू होईल, असे सांगण्यात आले. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकाही याच औषधाच्या तुटवड्याचा सामना करत आहे. फक्त महापालिकाच तुटवड्याचा सामना करत आहेत, असे नाही, तर खासगी कोविड रुग्णालयांमध्येही हे औषध नाही. टोसिलिझुमाबमुळे मृत्यू दर कमी होत नसल्याचे काही निर्माता कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या औषधावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी राज्याच्या कृतीदलाला दिले आहेत. हे औषध कोरोनावर तितके प्रभावी नाही. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्णांनी यावर भर देऊ नये, असे मला वाटते. कृती दल लवकरच यावर निर्णय घेणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

Related Articles

Back to top button