मराठी

महाराष्ट्रात ८० टक्के उभी पिके परतीच्या पावसाने खल्लास

केंद्राने तात्काळ १ लाख कोटींचे मदतीचे पॅकेज द्यावे -किशोर तिवारी 

यवतमाळ प्रतिनिधी दि १८ : ढगफुटी स्वरुपाच्या तसेच संततधार पडलेल्या परतीच्या पावसाने  अख्ख्या महाराष्ट्रातील १४० लाख हेक्टर वरील सर्व हातात आलेल्या पिकांपैकी सुमारे १२० लाख हेक्टरवरील सोयाबीन, धान, मका, कापुस, ज्वारी,  तुरी, ऊस बागायतीची पिके संपूर्ण नष्ट झाली आहे. हे संकट कमीतकमी १५० लाख कोटीच्या नुकसानीचे असुन ८० लाखावर शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. या अभूतपूर्व वातावरण बदलामुळे आलेल्या ऐतिहासिक संकटामुळे महाराष्ट्राची कृषी व ग्रामिण आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा करुन तात्काळ कमीतकमी १ लाख कोटीचे विषेश पॅकेज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दयावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.

महाराष्ट्रात एप्रिलपासून कोरोनाचा कहर सुरु आहे. अशातच केंद्र सरकारने अचानक केलेल्या विचारहीन लॉकडाऊनमुळे राज्याची आवक शून्य झाली असुन  राज्य प्रचंड आर्थिक संकटात आहे. अशा परीस्थितीमध्ये केंद्र सरकार मदतीचे पॅकेज देणार अशी अपेक्षा होती मात्र केंद्राने भोपळा दिला. पंतप्रधान कोविड केअर निधीमध्ये महाराष्ट्राने ९० टक्के निधी दिला मात्र त्याच महाराष्ट्राला वरचेवर मोदींनी वा-यावर सोडले असा आरोपही किशोर तिवारी यांनी केला. जर अशी अभुतपूर्व नभूतो नभविष्यती १२० लाख हेक्टरवरील पिके निवडणूक असलेल्या बिहारमध्ये  नष्ट झाली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी डझनावर दौरे करून मदतीचे पॅकेज घोषित केले असते, मात्र आज महाराष्ट्रात निवडणूक नाही तसेच भाजपाचे सरकार सुद्धा नाही म्हणूनच केंद्राची आमच्यावर वक्रदृष्टी आहे का असा प्रश्नही किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.

ज्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केली त्यातही शेतकऱ्यांना उद्योगासारखी कर्जमाफी  देतील असे वाटले होते मात्र त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. सरकारी बँकांनी यावर्षी फक्त लक्ष्याच्या ३० टक्के पीककर्ज वाटप केले आहे. त्यामुळे या अवकाळी अभूतपूर्व कृषी संकटावर मात करण्यासाठी तसेच महाराष्ट्राच्या आत्महत्या करीत असलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी संपुर्ण कृषीकर्ज माफी व कमीतकमी १ लाख कोटीचे मदतीचे पॅकेज द्यावे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांना मधात न आनता ही घोषणा करण्यासाठी नितीन गडकरी,  प्रकाश जावडेकर, पियुष गोयल या केंद्रीय मंत्र्याची  मदत घ्यावी तसेच अशा गंभीर प्रश्नावर केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांना संकटाची तीव्रता  ठेवण्यासाठी टाळावे असे कळकळीचे आवाहन सुध्दा किशोर तिवारी यांनी यावेळी केले आहे.

Related Articles

Back to top button