मराठी

आॅक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू

मागणीपेक्षा कमी पुरवठा; कोरोनाबाधितांचे हाल

पुणे : ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने कोरोनाबाधितांचे प्राम जात आहेत. मागणी आणि पुरवठा याचे गणित दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे काहीही करा; पण आम्हाला द्रव रूपातले ऑक्सिजन द्या अशी मागणी ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरणारे आणि पुरवठा करणारे व्यावसायीक करत आहेत आहे.

उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या तामलवाडी येथील ऑक्सिजन भरून देणा-या केंद्राला होत असलेला पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. पूर्वी दररोज दहा  टन द्रव रूपातील ऑक्सिजन प्राप्त होत असे. मागील एप्रिलपासून हा पुरवठा पाच टनांवर आला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण येथून नऊ तासांत द्रव रूपातील ऑक्सिजन तामलवाडीत पोहोचतो. दोन तासांत मोठ्या सिलेंडरमध्ये भरून 45 मिनिटांचा प्रवास करून रुग्णालयापर्यंत पोहोचतो; मात्र रिकामी सिलिंडर परत या केंद्रावर जाण्यासाठी सहा तासांहून अधिक वेळ लागत आहे. व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे रिकामी सिलिंडर उपलब्ध होत नाहीत. परिणामी जलदगतीने ऑक्सिजन सिलिंडरचा पुढचा टप्पा प्राप्त होण्यास विलंब होत आहे. पुढील दोन महिन्यांत रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होईल, असा अंदाज आहे.

एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा आणि दुसरीकडे रूग्णसंख्या वाढीचा आलेख पाहता, पुढील दोन महिने अधिक जिकिरीचे जाणार आहेत, असे चित्र आहे. राज्यात चाकण, रायगड, नागपूर आणि मुंबई या चार ठिकाणी द्रव स्वरूपातील ऑक्सिजन तयार करण्याचे कारखाने आहेत. चाकण येथील आयनॉक्स या कारखान्यात प्रतिदिवस 190 टन द्रव स्वरूपातील ऑक्सिजन निर्माण केला जातो. सलग नऊ तास प्रवास करून ऑक्सिजनचे टँकर तामलवाडी येथील केंद्रावर पोहोचतात. एप्रिलपूर्वी दर 24 तासाला 10 टन द्रव स्वरूपातील ऑक्सिजनचे रूपांतर वायू स्वरूपात केले जात होते. एप्रिलपासून हे प्रमाण 50 टक्क्यांनी घटले आहे. 150 किलोग्रॅम वजनाच्या एका सिलेंडरमध्ये ऑक्सिजन रूपांतरित करण्यासाठी साधारणतः सव्वा मिनिटाचा कालावधी लागतो. एका गाडीतून 90 सिलिंडरची वाहतूक सध्या केली जात आहे. 90 सिलेंडर भरण्यासाठी दोन तासांचा अवधी लागतो. सध्या उस्मानाबाद येथील सरकारी दवाखान्यासाठी 250 आणि खासगी दवाखान्यांसाठी 150, असे 400 मोठे सिलेंडर तामलवाडी येथून भरून पाठविले जातात. एकावेळी 32 सिलेंडर भरता येतील, अशा दोन ओळी आहेत. म्हणजे 64 सिलेंडर एकावेळी भरण्याची प्रक्रिया सुरू असते. सलग 24 तास हे काम सुरू आहे. रात्रंदिवस पाच मजूर, पाच चालक, तीन कार्यालयीन कर्मचारी आणि एक सुरक्षारक्षक हे काम करीत आहेत. दोन तासांत सिलेंडर भरणे, 45 मिनिटांचा प्रवास, अशा अवघ्या पावणेतीन तासात सर्व प्रक्रिया करून ऑक्सिजन सिलेंडर उस्मानाबाद शहरात दररोज पोहोचविले जातात. रिकामे झालेले हेच सिलेंडर या केंद्रावर परत करण्यासाठी मात्र आरोग्य यंत्रणेला सहा तासाहून अधिक अवधी लागत आहे. रिकामे सिलेंडर नसल्यामुळे पुढील सर्व प्रक्रियेचा खोळंबा होत आहे.

द्रवरुप आॅक्सिजनचाही तुटवडा
हवेतून ऑक्सिजन गोळा करण्याच्या प्रकल्पातून दररोज 400 सिलेंडर भरले जात आहेत आणि या प्रकल्पाची एकूण निर्मिती किंमत 55 लाख रूपयांच्या घरात आहे. उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयात एक टन क्षमतेचे द्रव स्वरूपातील ऑक्सिजन टँक उभा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहेत. द्रव स्वरूपातील ऑक्सिजनचा तुटवडा पाहता जिल्हा रूग्णालयातील या टँकला अपेक्षित पुरवठा होणार का, हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

Back to top button