मराठी

पुढचे ४८ तास काळजीचे

मुसळधार, अतिमुसळधारीचा इशारा

मुंबई/दि.१५ –  मुसळधार पावसाने राज्याला पुन्हा एकदा झोडपून काढले आहे. काही भागात तर एवढा पाऊस झाला, की गावे आणि शेती पाण्याखाली गेली. शहरांमधल्या रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. पावसाचा हा धोका टळला नसून महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आहे. शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान विभागाने केले. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या दक्षिण कोकण प्रदेशात अद्यापही कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्टयाची तीव्रता वाढेल. हा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकत जाऊन तीव्र स्वरूपाचा होईल. त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
समुद्राची स्थिती खवळलेली राहील. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशाराही विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या वादळ पूर्वानुमान विभागानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र काही तास कायम राहणार आहे. बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, कोकण गोव्यात आणि घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस होईल. दक्षिण कोकण आणि त्या जवळचा घाट प्रदेशात अति मुसळधार पाऊस असेल. कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार, अति जोरदार दक्षिण गुजरातचा किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात येत्या बारा तासात ताशी 20 ते 30 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हा वेग ताशी 40 किलोमीटरपर्यंतही पोहोचेल. त्यानंतर तीव्रता कमी होईल. अरबी समुद्राच्या मध्यपूर्व भागात तसेच उत्तर-पूर्व भागात ताशी 25 ते 35 ते  ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. गोवा महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीच्या प्रदेशात पुढील 12 तास ही स्थिती कायम असेल. वादळी वाऱ्यांचा वेग वाढत जाऊन अरबी समुद्राच्या मध्य पूर्व भागात तसेच ईशान्येकडे याचा जोर वाढत जाऊन महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीला 16 ऑक्टोबर संध्याकाळपासून जोरदार वारे वाहतील. याच भागात वाऱ्याचा वेग 17 ऑक्टोबरला वाढून ताशी 50 ते 65 ते 75 पर्यंत जाऊ शकेल.

पूरस्थितीचा इशारा

अरबी समुद्राच्या पूर्व मध्यभाग आणि ईशान्य भागात समुद्र खवळलेला ते अति खवळलेला राहील. महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर तसेच अरबी समुद्राच्या पूर्व मध्य आणि ईशान्य भागात जाऊ नये, असा इशारा मच्छीमारांना देण्यात येत आहे. पावसाच्या माऱ्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भात, केळी, पपई आणि इतर फळबागा, शेवगा आणि भाज्यांचे नुकसान होईल.  मुसळधार पावसामुळे कच्च्या बंधाऱ्यांचे नुकसान होईल. सखल भागांमध्ये पूर, पाणी साचणे, वाहतुकीत अडथळा, भूस्खलन होईल आणि पाणी साचेल. रस्ते ओले आणि निसरडे होतील. अतिवृष्टीमुळे नाल्यांमध्ये  अडथळे येऊन अचानक पूरस्थिती निर्माण होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button