मराठी

अयोध्येत महर्षी वाल्मिकी यांचा आश्रम व स्मारक व्हावे

गुरुदेव महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव समिती

अमरावती/दि. १९ –  रामायण ग्रंथाची निर्मिती करून संपूर्ण विश्वातील पिढ्यानुपिढ्यांपर्यंत प्रभू श्रीरामचंद्र यांची महती पोहोचविणा-या  रामायण रचियता आद्यकवी  महर्षी वाल्मिकी यांचा आश्रम व पवित्र स्मारकाची अयोध्येत निर्मिती करावी, अशी मागणी गुरुदेव महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव समितीच्या पदाधिका-यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीचे निवेदन भक्त बांधवांच्या वतीने विभागीय आयुक्त पियुष सिंह यांना देण्यात आले असून, त्यांच्यामार्फत ते प्रधानमंत्री महोदयांपर्यंत पाठविले जाणार आहे. गुरुदेव महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव समितीचे सहआयोजक महादेव कोळी समाज संघटनेचे नेते उमेश महादेवराव ढोणे यांचे नेतृत्वाखाली एकनाथ वावरे, प्रकाश दंदे, संतोष कोलटेके, श्रीमती मीरा कोलटेके, श्रीकृष्णा इंगळे, कैलास खोब्रखेडे, उमेश दंदे, गजानन  वानखडे आदींनी हे निवेदन दिले.
अयोध्येत श्रीरामाचे मंदिर निर्माण होत असताना रामायणाचे रचियता महर्षी वाल्मिकी यांचा आश्रम व स्मारकाची उभारणी झाल्यास अयोध्येत येणा-या भाविकांना व नव्या पिढीला ते प्रेरणादायी ठरेल, असे समितीने  निवेदनात म्हटले आहे.
महर्षी वाल्मिकी यांनी दिव्य ज्ञानाद्वारे प्रभू श्रीरामचंद्र  जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकी रामायण लिहीले. वाल्मिकी रामायणातून श्रीरामांचा इतिहास जगासमोर मांडला. वाल्मिकी यांनी लिहीलेला एक एक शब्द तंतोतंत खरा ठरला आहे. महर्षी वाल्मिकी यांची ओळख तसेच त्यांचा देदिप्यमान इतिहास जगासमोर येणे गरजेचे असून अयोध्या येथे  प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या परिसरातच महर्षी वाल्मिकी यांचा आश्रम स्थापन करण्याची मागणी  गुरुदेव प्रेमींनी भक्तांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
महर्षी वाल्मिकी यांनी प्रभू श्रीरामांचा इतिहास जगासमोर आणला. त्यांच्या किर्तीला साजेसा उत्कृष्ट असा आश्रम अयोध्येत निर्माण होणे गरजेचे आहे. या माध्यमातून गुरु-शिष्य परंपरा, इतिहास जगासमोर येण्यास मदत होईल. श्रीरामांसोबतच महर्षी वाल्मिकींचा इतिहास जुळलेला आहे. त्यांचे कार्य नवीन पिढीला
प्रेरणादायक ठरावा यासाठी केंद्र सरकारने याबाबत विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही हे निवेदन प्रधानमंत्री महोदयांना दिले आहे. प्रधानमंत्री महोदय नक्कीच या प्रस्तावाला मान्यता देतील व अयोध्यानगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांच्या भव्य मंदिराच्या परिसरातच महर्षी वाल्मिकी गुरुदेवांचा आश्रमही निर्माण होईल असा आम्हाला विश्वास आहे, असे समितीचे सहआयोजक व कोळी समाज संघटनेचे नेते उमेश ढोणे यांनी सांगितले.
राज्य शासनाने सुदधा महर्षी वाल्मिकी यांचा आश्रम व स्मारक अयोध्येला निर्मित करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button