मराठी

कंगनावर भाष्य करण्यास थोरातांचा नकार

मराठा आरक्षण राजकारणाचा नसून समाजाचा प्रश्न

मुंबई/दि.१४ – बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत(kangana Ranauat) आणि शिवसेनेत चांगलाच ‘सामना’ रंगला. या प्रकरणात राष्ट्रवादीने शिवसेनेची बाजू घेत जास्त महत्त्व देऊ नये, असा सल्ला दिला होता. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना थोरात यांनी मराठा आरक्षण प्रकरणावर आपली भूमिका मांडली. या वेळी पत्रकारांनी कंगना आणि शिवसेनेच्या वादावर प्रश्न विचारला असता थोरात यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
कंगना राणावत ही चंदीगडमध्ये पोहोचली आहे. ‘आपण इथे मोकळेपणाने फिरत आहे. मुंबईत सोनिया सेना आहे त्यामुळे दहशतीचे वातावरण आहे’, अशी टीका कंगनाने केली होती.
या प्रश्नावर थोरात म्हणाले, की हे जे काही प्रकरण आहे, त्यावर न बोललेले बरे’ असे म्हणून थोरातांनी या प्रकरणावर जास्त बोलण्याचे टाळले.
‘मराठा आरक्षणाच्या संदर्भाचा सर्वोच्च न्यायालयात खटल्यात आपण शासन म्हणून पूर्ण काळजी घेतली होती; पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती हा निर्णय अनाकलनीय आहे. स्थगितीचा विषयच नसताना न्यायालयाने हा निकाल दिला, यात पुढे कसे जायचे ते सरकार ठरवत आहे. सर्वांना एकत्र घेऊन याबाबत पुढे जायचे आहे. हा राजकारणाचा विषय नसून मराठा समाजाचा प्रश्न आहे’, असे मत थोरात यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत बोलले आहे. त्यांना सोबत घेऊन चर्चा करणार आहोत. न्यायालयात कशा प्रकारे जायचे आणि कशी भूमिका मांडायची यासाठी चर्चा करणार आहोत’, अशी माहितीही थोरात यांनी दिली.
सध्या अनेक प्रकरणावरून राज्य सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. राज्यातील वातावरण पाहता महाराष्ट्राला आणि सरकारला कसे बदनाम करता येईल, हे पाहिले जात आहे’, अशी टीकाही थोरात यांनी केली. महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे. निवडणुकीला चार वर्षे आहेत; पण श्रीहरी अणेंना काय घाई झाली मला माहीत नाही. राज्य सरकार सर्व पर्यायांवर विचार करत आहे’, असा टोला त्यांनी अणेंना लगावला. ‘विधान परिषदेच्या 12 जणांची नावे आम्ही लवकरच राज्यपालांकडे पाठवणार आहोत; पण राज्यपालांनीही ती नाव लगेच मंजूर करावी’, असेही थोरात म्हणाले.

Related Articles

Back to top button